शरद पवारांचे वर्गमित्र म्हणतात, हे भांडण फक्त लोकांना दाखविण्यापूरते

0
330

पुणे, दि. ८ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन गट निर्माण झाल्याने राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. देशाच्या राजकारणात जसे शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच राज्याच्या राजकारणात अजित पवार महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आजवर आपण पाहिले आहे. मात्र, सध्या या दोन्ही पवारांमध्ये फूट पडल्याने पुढील काळात राजकीय समीकरणे कमालीची बदलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीबाबत शरद पवारांचे वर्गमित्र आणि एकेकाळचे त्यांचे सहकारी राहिलेले, सध्या विरोधक समजले जाणारे चंद्रराव तावरे यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटी संदर्भात बोलताना तावरे म्हणाले की, उभी फूट, आडवी फुट ही केवळ लोकांना दाखविण्यापुरती आहे. मी ४० वर्ष त्यांच्याबरोबर (राष्ट्रवादी काँग्रेस) होतो. मला त्यांचा स्वभाव आणि त्यांना माझा स्वभाव माहित आहे. म्हणून मला असे वाटते की, ही फूट नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा समोर आणला असल्याने हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाने मिशन बारामती हा चंग बांधला आहे. त्यातच राज्यात नवीन राजकीय समीकरणे होत असताना आगामी लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांना कितपत अवघड होऊ शकते असा प्रश्न विचारला असता,याबाबत बोलताना तावरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकी दरम्यान असणाऱ्या वातावरणानुसार हे ठरेल. भाजपच्या नेतृत्वाने शांतपणे विचार केला तर झालेली चूक ते दुरुस्त करू शकतात,असेही त्यांनी सांगितले.