भाजपमध्ये बड्या नेत्यांचे घाऊकमधे प्रवेश होणार

2 Min Read

नागपूर, दि. २४ (पीसीबी) : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे नाश्ता केला. त्यांच्यात अर्धा तास चर्चाही झाली. त्यामुळे आशिष देशमुख भाजपमध्ये येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आशिष देशमुख यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र, बाजार समितीच्या निवडणुकानंतर भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बावनकुळे यांनी कधी प्रवेश होणार याची डेडलाईनच सांगून टाकल्याने पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार का? झाला तर त्याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपमध्ये कोण येणार? कोणत्या पक्षातून येणार? हे बावनकुळे यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतंय, भारतीय लोकांवर त्यांचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कसं सोडलं? याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिलंय. त्यांना रोज लोकं सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहीत आहे शिवसेना कुणाची? हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे हे मोदीजींचा ऐकेरी उल्लेख करतात. मोदीजी यांना देशानं पसंती दिलीय. मोदीजी यांचं वादळ महाराष्ट्रात आल्यावरे उद्धव ठाकरे उडून जातील. मोदीजी यांची उद्धव ठाकरे यांना भीती वाटतेय. 2014 आणि 2019मध्ये ज्यांच्या भरवश्यावर तुमचे खासदार निवडून आले. त्या मोदींवर टीका करणे ही बेईमानी आहे. आता मोदीजींच्या नावाने कितीही मशाली लावल्या तरी 2024 मध्ये त्या विझणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलताना तारतम्य सांभाळावे. मोदीजींना वारंवार ऐकेरी उल्लेख केल्यास स्फोट होऊ शकतो, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला.

आमचे तुमच्यावर उपकार
जाणीवपूर्वक चूक केल्यास आणि मोदींचा अपमान केल्यास असंतोष होईल. ऐकेरी बोलण्याचा किती दिवस संयम पाळायचा कार्यकर्त्यांनी? तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळू शकत नाही यात आमचा काय दोष? आमचे तुमच्यावर उपकार आहेत. पाच वर्षे मातोश्रीवरुन जे जे सांगितलं ते केलं. देवेंद्र फडणवीस यांनी भावाप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम केलं. तुम्ही बेईमानी केली. उद्धव ठाकरे त्यांची जुनी भाषणं विसरले आहेत. त्यांनी जुनी भाषणं काढून वाचावीत, असंही ते म्हणाले.

Share This Article