देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटमुळे खळबळ

0
155

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी मंगळवारी (१८ एप्रिल) संपूर्ण दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पण दुपारी खुद्द अजित पवार यांनीच पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला. या सर्व गदारोळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा नव्या चर्चांना सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा कार्यालयात काम करतानाचा फोटो ट्विट केला आहे.या फोटोमध्ये त्यांच्यासमोर फायलींचा पुर्ण गठ्ठाच दिसत आहे. ”Mission #NoPendency ! Office work. Clearing pendencies..कार्यालयीन कामकाज..” असे कॅप्शनही दिले आहे.यामुळे एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात एकीकडे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना माध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस कुठेही दिसले नाहीत की त्यांची कोणती प्रतिक्रीयाही आली नाही. पण रात्री उशिरा त्यांनी हे ट्विट केल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निकाल आता केव्हाही लागू शकतो. या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या हे ट्विट महत्वाचे मानलं जात आहे.

दरम्यान, इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. अजित पवार ४० आमदारांसह भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेदेखील काही वेळ नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या झळकू लागल्या. अजित पवार यांचा ताफा विधानभवनात पोहचला, काय होणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. त्यापाठोपाठ धनंजय मुंडेही विधानभवनात पोहचले. पण दुपारच्या दरम्यान खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चा केवळ अफवा आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार नसल्याचं जाहिर केलं. त्यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.