आगामी निवडणुकीत बारामतीत परिवर्तन होईल

0
198

भोर (जि. पुणे), दि. १० (पीसीबी) : आगामी २०२४ च्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के परिवर्तन होईल आणि भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी भोरमध्ये माध्यमांशी बोलताना केला. केंद्रीय मंत्री पटेल हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. भोरमध्ये सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीत बारामतीत परिवर्तन होईल, असे म्हटले आहे.

मंत्री पटेल म्हणाले की, भोरमध्ये मी मागच्या वेळीही आलो होतो. भाजप कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरील तयारी केली आहे आणि शक्तीकेंद्र प्रमुखांची मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती यामुळे मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. जलजीवन मशिनच्या माध्यमातून आम्ही देशातील ६० टक्के परिवाराला पाणी देण्यात यशस्वी ठरलो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘हर घर जल’ देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार स्वातंत्र्याच्या शंभरीतही सर्वांना आज इतकेच पाणी मिळावे, यासाठी मोदी यांनी अमृत सरोवर बनविले. नदीजोड प्रकल्पाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. देशातील तळ्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला पुढील वर्षापासून सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. ज्या लोकांना सध्या पाणी मिळत आहे, त्यांनी पाण्याचे जलपुनर्भरण करावे. त्यामुळे पुढील पिढीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध राहील, असेही पटेल यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, जेव्हा विरोधक जिंकतात, तेव्हा ते गप्प राहतात आणि जेव्हा ते निवडणुका हरतात, तेव्हा ते ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुढे करतात. संजय राऊतांना विचार की जेव्हा तुम्हा जिंकता, तेव्हा मशिन आमच्या ताब्यात नव्हत्या का. जेव्हा ते जिंकतात, तेव्हा गप्प राहतात आणि हरल्यावर मशिनमध्ये गडबड आहे, असा आरोप केला जातो.
संजय राऊत यांच्या विधानावर मला काही बोलायचे नाही. भाजप सदैव आपले काम करत राहणार पक्ष आहे. त्यांना मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, उत्तराखंड आणि गुजरातच्या निवडणुकीची तर आठवण ठेवलीच पाहिजे. कारण गुजरात महाराष्ट्राच्या शेजारी आहे. या सर्व ठिकाणी भाजपने विजय मिळविला आहे, अशा शब्दांत पटेल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाच राज्ये विरोधक जिंकतील, या दाव्याची खिल्ली उडवली.