माहिमची मजार पाडायचे आधीच ठरले होते, फक्त ठाकरे यांच्या सभेची प्रतिक्षा होती

0
194

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल जाहीर सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले आणि सकाळ-सकाळी लगेचच या पाडकाम करण्यात आले. मात्र, राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. कारवाईचे आदेश पत्र व्हायरल झाले आहे. त्यावरील तारीख सर्वांचे विशेष लक्ष वेधत आहे.
माहिमची मजार पडण्याचे आदेश 22 तारखेला देण्यात आलेत. तारीख पेनाने टाकली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंची सभा 22 च्या रात्री झाली आणि आज सकाळी कारवाई झाली. यासर्व घडामोडीवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

राज ठाकरेंनी माहिमच्या समुद्राच्या भागामध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविषयी माहिती देताच बीएमसीने लगेच कारवाईचे आदेश दिले. आदेशाचे सर्व पत्रक हे छापण्यात आलं आहे. मात्र, त्यावरील केवळ तारीख ही पेनाने टाकण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या माहितीनंतर आदेश पत्रक काढण्यात आले मग त्यावरील तारीख पेनाने का? हे पत्रक आधीच छापलं होतं आणि भाषणानंतर तारीख त्यावर टाकण्यात आली. अशी शंका उपस्थित होताना दिसत आहे.

काल गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेमध्ये माहिमच्या समुद्राच्या भागामध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. त्यानंतर लगेचच रात्रीत मुंबई महापालिकेने हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक माहिम इथं दाखल झालं आणि पाडकामाला सुरुवात झाली हे काम पूर्ण झालं आहे.