निवडणुका जिंकण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर

0
177

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. निवडणूक आयोगावर आम्ही देखील यापूर्वी संशय व्यक्त केला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

निवडणुकीसाठी मंत्रिमंडळ बैठक देखील रद्द केली होती. कधीही राज्यातील वातावरण एवढं गढूळ झालं नव्हत. यंत्रणांचा वापर असेल किंवा निवडणूक आयोगाचा वापर, निवडणूक जिंकण्यासाठी केला जात आहे. हे लोकांच्या समोर आले आहे.
मध्यवर्ती निवडणुकांवर आदित्य ठाकरे म्हणाले, संविधानानुसार निर्णय झाला तर ४० गद्दार अपात्र ठरतील. त्यामुळे या आमदारांच्या जागेवर पुन्हा निवडणुका लागतील. लोकशाहीला संपवून हे सरकार सत्तेत बसलं आहे. लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका घेणे गरजेचे आहे.

औरंगाबादच्या नामकरणाच्या श्रेयवादावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला. चंद्रावर रॉकेट पाठवायचं श्रेय देखील हे सरकार घेऊ शकतं. नासाचं पण हे सरकार श्रेय घेऊ शकतं. त्यामुळे त्यांना आनंद घेऊद्या. बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्वप्न होतं आणि उद्धव ठाकरे यांनी ते स्वप्न पूर्ण केले. हे संपूर्ण जगाला माहित आहे.