छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

0
177

संभाजीनगर, दि. २५ (पीसीबी) : छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे. आज नवी मुंबईत पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशनसुद्धा आहे. या अधिवेशनात असदुद्दिन ओवैसी, अकबरूद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असतील. याच अधिवेशनात संभाजीनगरच्या नामांतरावरुन पुढची रणनिती ठरण्याची शक्यता आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी काय केलंय ट्विट
नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील. आता औरंगाबादसाठी आमच्या शक्ती प्रदर्शनाची वाट पाहा. आपल्या लाडक्या शहरासाठी भव्य मोर्चा काढू! आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा. आम्ही निषेध करतो आणि आम्ही लढू, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar )असे नाव देण्यात आले आहे. तर उस्मानाबादचे धाराशीव ( Dharashiv) असं नामांतर करण्यात आले आहे. (Sambhajinagar and Dharashiv) केंद्र सरकारकडून नाव बदलण्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रात्री उशिरा राज्य सरकारनेही राजपत्र जारी करत याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तेव्हा आता शासकीय कागदपत्रांवरही शहरांचं नाव बदललं जाण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नामांतराला मंजुरी दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. तर संभाजीनगरात जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

नाव बदलण्याची कधीपासून मागणी?
औरंगाबाद पालिका महासभेत 1995 मध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा ठराव महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आला. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव माडंला. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पण या निर्णयाला तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी न्यायालयात आव्हान दिले, यावर कोर्टात सुनावणी सुरु असातनाच राज्यात आघाडी सरकार सत्तेत आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संभाजीनगरची अधिसूचना मागे घेतली आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातील याचिका निकाली निघाली.

महाविकास आघाडी सरकार अडचणीत असताना 29 जून 2022 ला तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळावे औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार फुटलेत. त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकाने पुन्हा याचा प्रस्ताव केला आणि त्याला मंजुरी देत तो केंद्राकडे पाठवला. यानंतर आता केंद्र सरकारने या सुधारित प्रस्तावाला मान्यता देत नामकरण केले आहे.