‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रे’च्या नियोजनासाठी मराठवाडा संमेलन उत्साहात संपन्न 

0
266

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याची माती, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्तपणे येत्या 12 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान पूर्णानगर येथे मराठवाडा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, मराठवाड्यातील 8 जिल्हे, मराठवाडा नावाशी संबधित 50 विविध संघटना एकत्र आल्या होत्या.

मराठवाडा संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज अॅड. जी. आर. देशमुख, सुधीर बिंदु, डॉ. विवेक मुगळीकर, उदय वाईकर, सुभाष जावळे, दिलीपराव देशमुख बारडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तसेच नितीन चिलवंत यांच्या मराठवाड्याच्या संबधीत चार संकल्प पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. अभिनव फांऊडेशचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण घटे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या www.globalmarathawada.org या संकेतस्थळाचे उद्घाटन एकनाथ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, डॉ. प्रिती काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मराठवाडा संमेलनासाठी मराठवाडा नावावर कार्यरत असणाऱ्या विविध संघटनाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये दिलीपराव बारडकर, प्रकाश इंगोले, मल्लीकार्जुन, भारत गोरे, गोरख भोरे, दत्तात्रय जगताप, सुनिल काकडे, शिवकुमारसिंह बायस, निळकंठ शेळके, डी. एस. राठोड, शंकर तांबे, श्रमिक गोजमगुंडे, प्रा. डॉ. प्रविण घटे, संतोष काळे, धनाजी येळेकर, मारुती बानेवार, आदिनाथ माळवे, शिवानंद चौगुले, विठ्ठल दळवे, संदीप चव्हाण, उमाकांत शेटे, प्रभाकर चेडे, नामदेव पवार, वामन भरगंडे, शाम भोसले, सुनिल नाईकनवरे, राहुल चंदेल, दत्ता थोरात, लक्ष्मण मुळुक, डॉ. विवेक मुगळीकर, सतिश काळे, समाधान गपाट, प्रल्हाद लिपणे, डॉ. यादवराव पाटील, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

येत्या 12 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. अॅड. जी. आर. देशमुख म्हणाले, की ही संवाद यात्रा मराठवाड्यात यशस्वी करण्याची जबाबदारी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती घेईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात संवाद यात्रेचे स्वागत करण्यात येईल. सुभाष जावळे म्हणाले, मराठवाडा मागास राहण्यामागची कारणे, शासन स्तरावरील अंमलबजावणीत दिरंगाई करणारे धोरणे कशी जबाबदार आहेत. तसेच 371 कलम लागू करुन मराठवाड्याचा आर्थिक तरतुदीतून विकास करावा.

अरुण पवार म्हणाले, की आपली दातृत्वाची भूमिका ठेवून कर्नाटक-महाराष्ट्र-तेलंगणा या ठिकाणाहून जाणाऱ्या या यात्रेसाठी सहकार्य व पाठबळ देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.  एकनाथ पवार म्हणाले, की पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई येथे मराठवाड्यातील जवळपास पाच हजार भूमिपुत्र यशस्वीपणे उद्योग व्यवसाय करत आहेत. त्यांनाही एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. सुधीर बिंदु, उदय वाईकर, नितीन चिलवंत यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन शिवकुमारसिंह बायस यांनी, तर आभार शंकर तांबे यांनी मानले.