किमान जनाची नाही तर मनाची ठेवा, सुप्रिया सुळेंची राज्यसरकारवर जोरदार टिका

0
200

मुंबई,दि.३०(पीसीबी) – एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात ‘ईडी’ सरकार सत्तेत आल्यापासून प्रकल्प बाहेर जात असल्याचा आरोप त्यांनी शिंदे सरकावर केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“राज्यात ‘ईडी’ सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत. आज हे सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामांवर टीका करतात. मात्र, ते विसरतात की भाजप-शिवसेनेची पाच वर्ष, महाविकास आघाडीची दोन-अडीच वर्ष आणि आता, अशी गेली सात वर्ष ते सत्तेत आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

“एखादा एमओयू महाविकास आघाडी सरकारने केला असेल तरी त्याचं क्रेडीट ईडी सरकारचं आणि एखादा प्रकल्प बाहेर गेला, तर त्याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडायचं, असा प्रकार सध्या सुरू आहे. माझी त्यांना एवढीच विनंती आहे, किमान जनाची नाही तर मनाची ठेवा”, असा हल्लाबोलही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

“प्रकल्प कोणत्या राज्यात जातो, त्याला माझा आक्षेप नाही. मात्र, जे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते, तीन महिन्यात असं काय झालं की हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत, याचं उत्तर मिळायला हवं, याची जबाबदारी ‘ईडी’ सरकारने घ्यायला हवी”, असेही त्या म्हणाल्या.

“पंतप्रधानांबरोबर त्याचं काय बोलणं होतं हे मला माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे, की ‘ईडी’ सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत. राज्यात नोकऱ्याही निर्माण होणं बंद झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होते आहे”, अशी टीकाही त्यांनी शिंदे सरकारवर केली.