पुढचे चार तास मुसळधार पाऊस

2 Min Read

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. रात्रभर मुंबईत पावसाची रिपरिपस सुरु होती. त्यानंतर सकाळपासून मुंबईसह, ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेर लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे, सांताक्रुज, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये गेल्या 15 मिनिटापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कमी झाला आहे. अंधेरी सबवे खाली पाणी कमी झालं आहे. त्यामुळं अंधेरी सबवे पुन्हा वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे. अंधेरी सबवे एक तास बंद होता. एक तासानंतर पुन्हा सुरु करण्यात आला आहे. अंधेरी सबवे सुरु केल्यानंतर अंधेरी पूर्व ते पश्चिमला जाणारा वाहनांचा मोठ्या रांगा लागलेला आहे.

Share This Article