एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलयं की….

0
307

– नितीन गडकरी यांच्या मिश्किल टिप्पणीची सर्वत्र चर्चा

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – ऐतिहासिक आणि नाट्यमय घडामोडींच्या नंतर अखेर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार स्थापन झालं आहे. बंडखोरीनंतर भाजपाने शिंदे गटाला वेळोवेळी मदत करणं, साथ देणं यावरुन हे दोघे एकत्र येणार अशा चर्चा सुरूच होत्या, शेवटी तेच झालं आणि या दोघांचं सरकार आलं. या सगळ्यावर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी भाष्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी एकनाथ शिंदेंविषयी मिश्किल टिप्पणी केली आहे. आम्ही आता एकनाथजींना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी आता सुसाट जाईल, अगदी बुलेट ट्रेनच्याही पुढे जाईल, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी केलेल्या भाष्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे.

राज्यातल्या विकासकामांबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. नितीन गडकरी म्हणाले, समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात भर घालणार आहे. देशातच नाही तर जगात राज्य खूप पुढे जाईल. आम्ही दिल्ली मुंबई हायवे बनवत आहोत. माझी इच्छा होती वरळी वांद्रे वसई विरार पर्यत घेऊन जायची. 50 हजार कोटींचा मोठा ब्रिज आपण बनवत आहोत. महाराष्ट्राचा जीएसटी माफ करा आणि ब्रिजच्या खालची जमीन मला द्या मी 50 हजार कोटी खर्च करीन आणि विकास करीन.जशी नवी मुंबई बनले आहे तसे नवे पुणे आणि औरंगाबादही करू.