जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘EDचा दबाव’? तडकाफडकी घेतलेल्या या राजीनाम्यावर संजय राऊतांच्या पुस्तकातून सनसनाटी गौप्यस्फोट

1 Min Read

दि.२१(पीसीबी)-शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन २३ मार्च रोजी होणार असून, या नव्या आवृत्तीत करण्यात आलेल्या काही दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्राचाळ प्रकरणात अटकेनंतर आर्थर रोड कारागृहात असताना राऊत यांनी हे पुस्तक लिहिले होते. आता नव्या आवृत्तीत चार अतिरिक्त प्रकरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.

या नव्या प्रकरणांमध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत धक्कादायक दावा करण्यात आला आहे. राऊत यांच्या मते, धनखड यांच्यावर ईडीचा दबाव आणून त्यांचा राजीनामा घेण्यात आला. जयपूरमधील मालमत्ता व्यवहार आणि परदेशात निधी हस्तांतरणाशी संबंधित कथित प्रकरणाची फाईल तयार करून ती त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

तसेच, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या कुटुंबालाही ईडीच्या माध्यमातून दबाव टाकण्यात आल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे केंद्रीय यंत्रणांच्या वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी जगदीप धनखड यांची भेट घेतली होती, ज्यामुळे या प्रकरणाला अधिकच चर्चेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकातील नव्या खुलास्यांमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, या दाव्यांवर पुढील काळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Share This Article