महापालिका निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन असणार नाहीत

2 Min Read

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्ष यासाठी झटत आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगामी काळातील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळण्याची शक्यता आहे. असं असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खूप मोठी बातमी समोर येत आहे. या निवडणुका एकत्र होणार नाहीत, अशी माहिती आता समोर येत आहेत. तसेत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे.

स्थानिक स्वराज्य संसस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. पण तरीही पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अद्याप निश्चित नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही, असे देखील संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.

राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. देशात राज्य निवडणूक आयोगाच्या अख्त्यारित ज्या निवडणुका होतात त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात नाही. कारण एकापेक्षा जास्त प्रभाग पद्धत असते. त्यामुळे एका पेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. तसेच त्यांची मतमोजणी करायची असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

Share This Article