भुजबळांना दूर ठेवता पण, ज्याच्यावर खूनाच्या कटकारस्थानाचा संशय आहे त्यांना…

2 Min Read

मुंबई, दि.24 (पीसीबी) : आपण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता. पण ज्याच्यावर एका खूनाच्या कटकारस्थानाचा संशय आहे अशा व्यक्तींना दूर ठेवू शकत नाही. कारण तुमचं जातीचं राजकारण आहे. भुजबळांना काही आमदारांचा विरोध आहे म्हणून लांब ठेवल्याचं सांगता पण इथे जनतेचा विरोध आहे, बीडसह महाराष्ट्रातील जनतेचा विरोध आहे. अजित पवारांसमोर घोषणा देण्यात आल्या. आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल, देवेंद्रजी तुमच्याच हिंमत असेल तर बीडमधील खऱ्या आरोपींना पकडून दाखवा ना, असं आव्हान संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.

देशात लोकशाही आहे का, महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षा परिस्थिती गंभीर आहे हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमधील घटना राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत. भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशियत गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळात आहे. बीड आणि परभणीसंदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आणि रोष आहे अशी लोक मंत्रिमंडळात आहे. आपण त्यांना घेतलेलं आहे, न्यायाच्या गोष्टी करता स्वत: एकदा बीडला जा, गृहमंत्री म्हणून गेलात का? मग राहुल गांधी परभणीला गेल्यावर मग आपलं पित्त का खवळावं, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना दर्जा दिलेला आहे तो कॅबिनेट मंत्र्यांचा आहे. तो दर्जा नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी दिलेला नाही. जेव्हा हातात होते तेव्हा विरोधीपक्षनेते मिळू दिले नाही. मोदींना बहुमत नाही, ते कुबड्यांवर आहेत. परभणीला तुम्ही गेलात का, जरी गेलात तरी सैन्य घेऊन जाल. राहुल गांधी आले तर टीका करता, देशमुख कुटुंबाचा त्या माऊली आणि मुलांचा आक्रोश कानाचा पडदा फाडत नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निर्दयी आहात. राहुल गांधींमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण देशपातळीवर गेली आणि तुमची बेअब्रू झाली. राहुल गांधी आले त्यांचे मी आभार मानतो, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

Share This Article