अरे, छत्रपतींना तरी सोडा… – राज ठाकरेंनंतर शर्मिला ठाकरे गरजल्या

1 Min Read

सिंधुदूर्ग, दि. 29 (पीसीबी) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ते बांधकामात भ्रष्टाचार होत असताना आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीही भ्रष्टाचार झाल्याने त्यांनी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मला इतकं दुखं होतंय ताशी ४५ किमी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. त्यांचे इतके गडकिल्ले अजूनही उभी आहेत. त्यापेक्षा जास्त वारा ते सोसत आहेत. त्यामुळे तुम्ही किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा.”

“मुंबई-नाशिक रस्त्यात भ्रष्टाचार झालाय. तिथे खड्डे आहेत. मुंबई-गोवासाठी तर आम्ही आंदोलन करून थकलो. कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे आहेत की ते अजूनही त्यांना मतदान करतात. जो पुतळा पडला तो अखंड पोकळ पुतळा होता. असा पोकळ पुतळा समुद्रकिनारी कोण उभा करतो?”, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

“शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेले विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ते तर कधीच पडले पाहिजे. त्याची तटबंदी अजूनही चांगली आहे. साडेतीनशे वर्ष जुना असल्याने त्याची आतमध्ये पडझड झाली असेल. पण तुमचा पुतळा आठ महिन्यात पडतो. छत्रपतींना तरी सोडा. तुम्ही चांगल्या कंपन्या घ्या आणि चांगले रस्ते तरी बनवायला सांगा”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Share This Article