आपल्या आयुष्यात आई-वडील नेहमी प्रथमस्थानी असायला हवेत – सीमाताई सावळे

bpcauthor bpcauthor
2 Min Read

जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भोसरी, (दि.०७) – जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व स्थायी समितीच्या माजी सभापती, जेष्ठ मा. नगरसेविका सिमाताई सावळे यांच्या वतीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दि. ०६ (रविवार) या दिवशी सायं. ४ वाजता मोशी प्राधिकरणातील सेक्टर ४ येथील विरंगुळा केंद्र येथे पार पडला.

यावेळी बांधकाम व असंघटित कामगार संघाचे अध्यक्ष सारंगजी कामतेकर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक आणि जिजाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी व शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सारंगजी कामतेकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देत पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमाताई सावळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्व समजावून देत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले.

सिमाताई म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे आई-वडील, पालक खूप कष्ट घेतात. त्यांना उत्तम शिक्षण कसे मिळेल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या या कष्टामुळे आज विद्यार्थी यशाची पायरी चढत आहेत. त्यामुळे आपले पालक हे नेमही आपल्या आयुष्यात प्रथमस्थानी असायला हवेत. तुम्ही देवाला नमस्कार करता कि नाही माहित नाही, पण दररोज आई-वडिलांना नमस्कार करा…तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमी भासणार नाही.” अशा शब्दात सिमाताईंनी विद्यार्थांना शिक्षणासोबतच पालकांचेही महत्व समजावून सांगितले.

सारंगजी कामतेकर म्हणाले, “१० वी, १२ वी ही यशाची पहिली पायरी आहे, खरी परीक्षा इथून पुढे सुरु होणार आहेत. आपल्याला माहीत नसेल इतक्या क्षेत्रात सध्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला नक्की कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे हे आताच ठरवणे फार गरजेचे आहे.” असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना थोडक्या शब्दात पण मोलाचं मार्गदर्शन केलं.

यावेळी अमोल थोरात, साळुंके साहेब, म्हेत्रे साहेब, प्राध्यापिका ज्योती सिंग, वर्षा मुंडे, सचिन मुंडे, निवृत्ती अमुप, बबनराव गाढवे, अरुण गरड, शंतनू जाधव, संदीप नलावडे, अनिकेत पोतदार, शाहरुख शेख, सुनिता हिरवटे, सारिका हुलावळे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

Share This Article