राष्ट्रवादीत पहिला स्फोट झाला, दुसरा बाकी

bpcauthor bpcauthor
3 Min Read

मुंबई, दि. २ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व्हा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. परंतु या निमित्ताने १५ दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे १५ दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, येत्या १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार आहे. एक स्फोट दिल्लीत होईल आणि दुसरा स्फोट महाराष्ट्रात होईल. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात होती. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे सर्वांच्या नजरा होत्या. परंतु आता राज्यात राजकीय स्फोट झाला आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हाच राज्यातील स्फोट आहे.

भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे आणि योग्य वेळी फिरवली नाही तर करपते, असे शरद पवार यांनी नुकतेच सांगितले होते. म्हणजेच नेतृत्व बदलाची हीच योग्य वेळ असल्याचे संकेत पवारांनी दिले होते. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली. म्हणजेच हा पहिला राजकीय स्फोट महाराष्ट्रातून झाला आहे. आता दुसरा राजकीय स्फोट कोणता असू शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता दुसरा राजकीय स्फोट –
दुसरा राजकीय स्फोट दिल्लीतून येईल, असे सुळे म्हणाल्या होत्या. शिवसेनेच्या या 16 बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयातून निर्णय येणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरुद्ध गेला तर एकनाथ शिंदे यांना झटका बसेल आणि महाराष्ट्रात नवी राजकीय खिचडी शिजली जाऊ शकते. यामुळे दुसरा स्फोट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असणार आहे.

‘लोक माझे सांगाती’च्या कार्यक्रमात घोषणा
शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात अनेक मोठे खुलासे केले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काय घडलं. याबाबत ही या पुस्तकात पवारांनी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सकाळचा शपथविधी, राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती आणि उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अशा अनेक विषयांवर त्यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे. याच कार्यक्रमात शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला.

Share This Article