संजय राऊतांना अटक होणारच

2 Min Read

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणात समन्स बजावला होता. याप्रकरणी ईडी कार्यालयात त्यांची तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. यानंतर आता मेधा किरीट सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊतांना सुनावणीस हजर राहण्याचा आदेश शिवडी न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

याप्रकरणी “संजय राऊतांना अटक तर होणारच” असं खळबळजनक विधान भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. कागदोपत्री कोणताही पुरावा नसताना संजय राऊतांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यामुळे राऊत यांना न्यायालयात हजर राहवं लागणार आहे. न्यायालयात हजर न झाल्यास त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघून त्यांना अटक होणारच,” असा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने ब्लॅकमेलिंग आणि दहशत माजवण्याचा धंदा सुरू केला होता. किरीट सोमय्या परिवारावर त्यांनी २२ आरोप केले होते. कागदोपत्री एकही पुरावा नसताना, त्यांनी खोटे आरोप केले. त्यामुळे संजय राऊतांना धडा शिकवण्यासाठी सोमय्या परिवाराने एका प्रकरणात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता हा खटला न्यायालयात गेला असून शिवडी न्यायालयाकडून संजय राऊतांना समन्स बजावला आहे.”

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “मेधा किरीट सोमय्या यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यासाठी उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश देखील दिले. पण चौकशीत काय समोर आलं? तर नगरविकास मंत्रालय, एमएमआरडीए, मीरा भाईंदर महापालिका आणि वनविभागानं कोणताही घोटाळा झाला नसल्याचं सांगितलं,” असा दावाही सोमय्या यांनी केला.

Share This Article