२०० कोटींच्या कर्जाला जबाबदार ‘या’ शुक्राचार्यांना बाजुला करा – शरद पवार यांचा इशारा

0
265

अकोले (अहमदनगर), दि.२४ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्याच्या कार्यक्रमात बोलताना एकेकाळचे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला. जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही असं म्हणत मधुकर पिचड यांचा पवारांनी शुक्राचार्य असा उल्लेख केला. तर या शुक्राचार्यांना अगस्ती सहकारी साखर कारखान्यातून बाजूल करा कारखान्यासाठी मी तुम्हाला सर्वोतपरी मदत करतो, असं पवार म्हणाले.

शरद पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवारांचे जुने सहकारी माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी पवारांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात केलेल्या भाषणात त्यांनी पिचडांचा जोरदार समाचार घेतला.

“जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली त्यावेळीच जनतेच्या मनातल मला कळालं होतं. जनतेला परिवर्तन हवं होतं. किरण लहामटे यांनी वैभव पिचडांना पराभूत करुन ते परिवर्तन घडवून आणलं”, असं पवार म्हणाले.

“अकोल्यातला अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याचं मला कळालं. कारखान्यावर 200 कोटीच‌ं कर्ज झालं आहे. जे या‌ कर्जाला जबाबदार आहे त्या शुक्राचार्यांना बाजूला करा, कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो”, असं म्हणत पवारांनी पिचडांवर टीका केली.

मधुकर पिचड हे शरद पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 ला स्थापना झाली. त्यावेळी पवारांसोबत मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक राहिले. पवारांनी पिचड यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. राष्ट्रवादी सत्तेत असताना पिचड कायम लाल दिव्यात राहिले. मात्र प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पिचड यांनी आपल्या मनगटावरचं राष्ट्रवादीचं घड्याळ काढून भाजपचा उपरणं आपल्या खांद्यावर घेतलं.

एखादा नेता पक्षाला सोडून गेल्यावर शक्यतो पवार त्या नेत्यावर कधी जास्त बोलत नाही किंबहुना त्या नेत्यावर बोलून त्याला अधिक मोठं करत नाहीत. पण पिचड यांच्याबाबत जरा वेगळं आहे. पवारांच्या खांद्याला खांदा लावून मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत निष्ठेने काम केलं. त्यांचं निष्ठेचं फळ पवारांनी त्यांना अनेकदा दिलं मग ते मंत्रिपदाच्या रुपात असेल किंवा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाच्या रुपात असेल. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष अडचणीत होता, पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के बसत होते, अनेक सहकारी सोडून जात होते, अगदी त्याच वेळी पिचडांनीही शरद पवार यांच्यापासून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला जो पवारांना फार मोठा धक्का होता.