हिंमत असेल, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगळे लढून दाखवावे – चंद्रकांत पाटील

0
625

सांगली, दि. २ (पीसीबी) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हिंमत असेल, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळे लढून दाखवावे,  असे आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिले आहे.

आज (बुधवार) सांगलीत आयोजित एका सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले की, कितीही भांडणे असली तरी भाजपला इतर पक्षांना एकत्र येऊन लढावे लागते, यातच भाजपचा विजय आहे. असे सांगून  त्यांनी भाजप-शिवसेनेच्या युती होण्याबाबत सुचक विधान केले. तर  भाजप-शिवसेना युतीवर बोलताना ते म्हणाले की, केवळ राज्यात युतीचे सरकार टिकावे, यासाठीच मुंबईत भाजपचा महापौर केला नाही. नाहीतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर झाला असता.

गत विधानसभा निवडणुकां भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या लढवल्या होत्या. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही वेगवेगळे लढले होते. आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित झाली आहे.  त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळे लढून दाखवण्याचे आव्हान पाटील यांनी दिले आहे.