हिंगोलीजवळ ट्रक आणि जीपच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

0
754

हिंगोली, दि २१ (पीसीबी) – भरधाव ट्रकने जीपला दिलेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे दोनच्या हिंगोलीजवळील कलगाव-पारोळा शिवारा नजीकच्या रस्त्यावर घडली.

गणेश लक्ष्मण हजारे, नरसिंह सोपान हजारे, सतिश नारायण मुरकुटे, राजू विष्णू धामणे, अनिल गजानन चव्हाण आणि स्वप्नील राम इरतकर (सर्व रा. आडगाव, जिल्हा वाशिम) असे मृत इसमांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे दोनच्या सुमारास वाशिमहून जीप (एमएच/३७/ व्ही/२४४४) हिंगोलीकडे जात होती. त्यावेळी हिंगोलीपासून पाच किमी अंतरावर कलगाव-पारोळा शिवारात वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकने (एचआर/६९/ए/६८८५) जीपला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये जीपमधील सहा जण ठार झाले. त्यानंतर लगेच पोलिस पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातामध्ये जीपचा चुराडा झाला असून धडक एवढी जोरात होती की त्यामुळे ट्रकच्या समोरील चाकांचे रॉड तुटूले. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मृतांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना जीपचे दरवाजे तोडावे लागले. गंभीर जखमी असलेल्या दोघांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करुन नांदेड येथे हलवण्यात आले आहे.