मुंबई, दि. ८ (पीसीबी) – नारायण राणे यांचे आत्मचरित्र हे केवळ दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी आहे. मात्र स्वत:वर झालेल्या आरोपाचे काय? त्याचे स्पष्टीकरण आत्मचरित्रात का नाही? असा सवाल सिंधुदुर्गचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
श्रीधर नाईक हत्या प्रकरण, चेंबूरमधील गुन्हे, कोकणातील गुन्हे यावर राणेंनी आत्मचरित्रात स्पष्टीकरण का नाही दिले? असा सवाल नाईक यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आत्मचरित्र हे फक्त प्रसिद्धीसाठी आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करून काही फायदा नाही. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सक्षम आहे. नारायण राणे पक्षातून गेल्यावर कोकणातून जास्त आमदार निवडूण आले होते, याची आठवण नाईक यांनी करुन दिली आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.