सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाबासाहेबांचा सन्मान – शरद पवार

0
570

मुंबई, दि.२६ (पीसीबी)- महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला असून उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. हा निकाल योगायोगाने संविधान दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

“राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्मानीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगाने संविधान दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा असंही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावे असंही न्यायालयाने सांगितले आहे.

“लोकशाही मूल्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. लोकांना चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. तसंच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश आम्ही देत आहोत,” असे न्यायाधिशांनी स्पष्ट केले.