शिवसेना संपवण्याचा या नेत्याचा डाव – शिवाजी आढळराव पाटील..

0
440

 पुणे, दि. ३ (पीसीबी) – राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अंर्तगत कुरबुरी सातत्याने समोर येत आहेत. त्यात आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडी आम्ही मान्य केली असून आम्ही आघाडीची तत्वं पाळत आहोत. परंतु शिवसेना संपवण्याचा डाव जिल्ह्यात सुरु आहे. आमचं अस्तित्व राहू द्या. आमची जास्त काहीही मागणी नाही. शिवसैनिकाला सुखाने जगू द्या असं त्यांनी म्हटलं आहे.

बैलगाडा शर्यतीवरूनही उपटले कान
महाविकास आघाडीबद्दल गेल्या 2 वर्षापासून खूप वाईट अनुभव आहे. खेड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती 6 महिने जेलमध्ये राहावं लागलं. लांडेवाडी येथे होणारी बैलगाडा शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतीली परवानगी मिळाल्यानंतर पहिलीच बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली म्हणून ती इतरांच्या डोळ्यात खूपली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. हे सगळं कारस्थान जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासनाने मिळून केले आहे. शिवसैनिकांना जगू द्या, शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आमचं अस्तित्व राहू द्या. आम्हाला मारु नका. गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही. आम्हाला जगू द्या. वरिष्ठांच्या कानावर वेळोवेळी या गोष्टी सांगत आहोत अशी खंतही शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हयात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील वाद काही नवीन नाही. गेल्या खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीमध्येही चांगलेच खटके उडाले होते. खेडचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारा विरोधात शिवसेना नेते आढळराव पाटील यांनी अनेकदा आरोप केले. त्याचे पडसाद राज्य पातळीवरही उमटले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल असं राऊतांनी म्हटलं होतं. 2019 च्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होत ,काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापना झाले भाजपाला विरोधी बाकांवर बसवलं. मात्र राज्य पातळीवरील स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याला ही महाविकास आघाडी अद्यापही रुचली नसल्याचे दिसून येत आहे.