गुहागर, दि.२६ (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रवेशाच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत. त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असा खुलासा करून राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षांतरांच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त रविवारी माध्यमांमधून दिले जात होते. यावर खुलासा करताना जाधव म्हणाले की, आपण कोणालाही भेटायला गेलो नव्हतो. मी कुठेही गेलेलो नाही. दिवसभर निवासस्थानी विश्रांती घेत होतो. माध्यमातून दाखविल्या जाणारे वृत्त खोटे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकी दरम्यान कोकणातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी कोकणातील एक वजनदार नेता भाजप किंवा शिवसेना या पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावेळीही जाधव यांनी पक्ष सोडण्याचा विचार नसल्याचे म्हटले होते.