शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजे यांचे वर्तन नीतिमत्तेचे असायला हवे- उद्धव ठाकरे

0
581

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजे यांचे वर्तन नीतिमत्तेचे असायला हवे होते. सातारची गादी छत्रपती शिवरायांची म्हणून मानसन्मान आहे. त्यामुळे छत्रपतींचे नाव घेऊन कुणी अल्टी – पल्टी करत असेल तर चालणार नाही हे सातारकरांनी दाखवून दिले. उदयनराजे भोसले यांचा हा व्यक्तिगत पराभव आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक तसंच सातारा लोकसभा पोचनिवडणुकीच्या निकालावरुन टीका केली आहे.

“शिवसेना-भाजप यांनी ‘युती’ म्हणून लढूनही राष्ट्रवादी व काँग्रेसला इतके यश का मिळाले? पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात दहा सभा घेतल्या. अमित शहा यांनी ३७० कलमावर चाळीस सभा घेतल्या. उदयनराजे भोसले यांच्यासाठी मोदी यांनी साताऱ्यात खास सभा घेतली. उदयनराजे यांचे पक्षांतर दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर झाले व आता सातारचे छत्रपतीच भाजपसोबत असल्याने महाराष्ट्रात आपल्यालाच शिवरायांचा आशीर्वाद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले; पण सातारच्या जनतेने उदयनराजे यांचा पराभव केला . यापासून काय तो धडा घेणे गरजेचे असल्याचे,” उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“सत्तेचा उतमात करून राजकारणात कोणालाही कायमचे संपवता येत नाही आणि ‘ हम करे सो कायदा’ चालत नाही. स्वबळावर भाजपला बहुमत मिळवता आले नाही. भाजपच्या अनेक बालेकिल्ल्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मारलेल्या मुसंडीचे विश्लेषण करायला वेळ लागेल. पक्ष फोडून व पक्षांतरे घडवून मोठा विजय मिळवता येतो हा भ्रमाचा भोपळा राज्याच्या जनतेने फोडला. पक्षांतरे करून ‘ टोप्या ‘ बदलणाऱ्यांना जनतेने घरी पाठवले आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. पाच महिन्यांपूर्वीच निवडून आलेल्या उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक चर्चेत होती. उदयनराजे यांचा पराभव भाजपासाठी धक्का देणारा तर राष्ट्रवादीसाठी दिलासा देणारा आहे.