‘शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं’ – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांचे प्रतिपादन

0
262

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) : ” तळागाळातले लोक शिकून मोठे होत आहेत , ही समाधानाची गोष्ट आहे.परंतु त्यांनी आता जातीपातीतच अडकून न पडता त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला पाहिजे “, अशा आशयाचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी केले. ते काळेवाडी येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे होते. मातंग साहित्य परिषद , महाराष्ट्र ह्या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी ह्या दोहोंच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते.

ह्या प्रसंगी पिंपरी येथे संपन्न झालेल्या ८९ व्या आ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या डॉ.श्रीपाल सबनीस ह्यांना , तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख पद भूषवलेल्या प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांना ‘ समाजमित्र पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला. औरंगाबाद येथील मातंग समाजाचे गाढे अभ्यासक डॉ.अंबादास सगट ह्यांना ‘ समाजरत्न पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला. डॉ.राजाभाऊ भैलुमे ( शिरूर ) आणि डॉ.बाबासाहेब शेंडगे ( कोपरगाव ) ह्या मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्यासकांना ‘ समाजबंधू पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला. डॉ.सौ.प्रिया अमित गोरखे आणि जालिंदर कांबळे ह्यांना ह्या प्रसंगी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह , शाल , बुके आणि अण्णा भाऊंचा ग्रंथ असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार स्वीकरल्यानंतर डॉ.श्रीपाल सबनीस ह्यांनी”हा केवळ समाज मित्र पुरस्कार नाही.तर तमाम मातंग समाजाचा अशिर्वाद आहे.हा अशिर्वाद मातंग समाजातील सर्वसामान्यांनाचा,कष्टकरी जनतेचा अशिर्वाद आहे.हा पुरस्कार म्हणजे बहुसांस्कृतिकतेचे नाते सांगणारा आहे.”तर डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञाता व्यक्त केली.डॉ.अंबादास सगट ह्यांनी “अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात आपली भावना व्यक्त करून आरक्षण वर्गीकरण राज्य शासनाने करावे अशी भूमिका व्यक्त केली.” कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.डी.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात “मातंग साहित्य परिषदेने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात मला बोलावले त्यानित़मित्ताने अण्णा भाऊ साठे यांना साहित्यिकांच्या व्यासपीठावर अभिवादन करण्याची वेगळी संधी त्यानिमित्ताने प्राप्त झाली. “

या कार्यक्रमात संपत जाधव लिखित ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र आणि चिंतन’ डॉ.अंबादास सगट लिखित ‘ मातंग आणि सांस्कृतिक राष्ट्रसंघ भारत ‘ या दोन ग्रंथांचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. ह्या सोहळ्याला सचिन ईटकर( उद्योजक ) , राजन लाखे ( म.सा.प. पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष ) , दादासाहेब सोनवणे ( दलित स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख ) , संतोष कोकणे , विनोद नढे ,नीता पाडाळे , उषा काळे , हे नगरसेवक, तसेच अमित गोरखे,भगवान पवार,भगवान शिंदे,अनिल सौंदाडे, अविनाश कांबीकर,रिंकू अडागळे,निलेश भिसे,भगवान वैरागर,शिवाजी भिसे,अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती सोलापूरचे अध्यक्ष सुरेश पाटोळे,मारुती दाखले,नाना कसबे,भास्कर नेटके, शेषनारयण पवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी आसाराम कसबे ह्यांनी लहुवंदना सादर केल्यानंतर मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले , तर शेवटी शंकर तडाखे ह्यांनी आभारप्रदर्शन केले. कोरोनासंदर्भातील सर्व शासकीय निर्बंधांचे पालन करीत हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि देखण्या स्वरूपात पार पाडण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संतोष ससाने,शिवाजी भिसे, यांनी परिश्रम घेतले.