अहमदनगर, दि. ११ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोपरगावमधील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर तोफ डागली. शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटू लागला आहे. त्यांना जळी-स्थळी नागपूरचे गुंड दिसायला लागले आहेत. एका सामान्य नागपुरकराने त्यांची ही अवस्था करून ठेवलीय, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली.
कोपरगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी कलम ३७० आणि पाकिस्तानचा मुद्द्यावर बोलणे टाळून गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावमधील बंडखोरीवर सूचक वक्तव्य केले. आमदार स्नेहलता कोल्हे माझ्या भाची आहेत. त्यामुळे मामा म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे माझे कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले.