पुणे, दि. ७ (पीसीबी) – बारामतीचा निकाल वेगळा लागला, तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलासादायक विधान केले आहे. पवारांनी बारामतीत बऱ्यापैकी कामे केली आहेत. बारामतीत पराभव होईल, याची भीती मला खरी वाटत नाही. बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.
बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव झाल्यास ईव्हीएममधील फेरफारामुळेच होऊ शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर आंबेडकर यांनी मात्र पवारांची ही भीती अनाठायी आहे, असे सांगितले. मात्र, इतर मुद्द्यांवरून त्यांनी पवारांवर निशाणा साधला. दुष्काळी भागाचा दौरा मी देखील केला, पण त्याचे मार्केटिंग केले नाही. मेलेल्या टाळूवरचे लोणी खायची मला सवय नाही. ५० वर्षे ज्यांनी पाणी चोरले, ते आता दुष्काळावर बोलत आहेत, असा टोला आंबेडकर यांनी पवार यांना लगावला.