लोकांनी फरफटत यावं, अशी भाजपची अपेक्षा होती; काँग्रेस नेत्याचा दावा

0
191

कोल्हापूर,दि.०५(पीसीबी) – “मी याचं समर्थन करणार नाही. पण भाजपने ज्या सोशल मीडियाचा वापर करुन 2014 साली सत्ता मिळवली, आता त्याच सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपने जे पेरलं तेच उगवलं. लोकांनी फरफटत यावं, अशी भाजपची अपेक्षा होती”, असा दावा काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. कोल्हापूरमध्ये आज (5 डिसेंबर) कोल्हापूर ब्रँड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं भाषण व्हायरल होत आहे, ज्यात आपण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकली असं ते म्हणत होते. सगळं जग आपल्या ताब्यात असलं पाहिजे, अशा अविर्भावत चंद्रकांत दादा बोलत होते. आता निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. हा राज्याचा मॅनडेट आहे. वातावरण बदलत चाललं आहे. भाजपचं धोरण चुकलं. कित्येक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचंच प्रतिबिंब निकालात दिसलं”, असं सतेज पाटील यांनी सुनावलं.

दरम्यान “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची चांगली मोट बांधली”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर “लोकांना विधानसभा निवडणुकीनंतर मतदानाची संधी मिळाली नव्हती. आता ती मिळाली आहे. शेतकरी, सुशिक्षित भाजपच्या बाजूने नाहीत याची साक्ष मिळाली आहे. लोक रोष व्यक्त करत आहेत”, असं सतेज पाटील म्हणाले.