लातूर, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवार) लातूर दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ४ लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांशी शहा यांनी चर्चा केली. लातूर-नांदेड-हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ७१३ भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अमित शहांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. ‘वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई, तो पटक देंगे’, असा इशारा अमित शहा यांनी शिवसेनेचे नांव न घेता दिला. शिवसेनेसोबत युती नाही झाली. तरी ४८ पैकी ४० जागांवर भाजप उमेदवार निवडून येतील, ही तयारी भाजप कार्यकर्ते करतील, असे शहा यांनी कार्यकर्त्यांना बजावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहा यांच्या स्वबळाच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. लातूर, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबादमध्ये भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या बैठकीनंतर अमित शहा जिल्ह्यातील विविध घटकातील प्रमुख निवडक नागरिकांशी दयानंद सभागृह येथे संवाद साधणार आहेत.