राज्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करणार – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

0
224

सांगवी, दि. २४ (पीसीबी) – राज्य सरकारने महाराष्ट्रातील साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार केला आहे. आता नर्सरी ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे आणि नंतर राज्यातील सर्व पुरूषांचा आरोग्य डेटा तयार केला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर व महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अशा प्रकारे आपल्या राज्यातील नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस हे पहिले सरकार आहे. केवळ आरोग्य डेटा गोळा करून हे सरकार थांबणार नाही. तर राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य तपासण्या व उपचार उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित दोन दिवसीय अटल महाआरोग्य शिबीराचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते आज (शनिवारी) उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नारायणपूरचे नारायण महाराज, माजी महापौर उषा ढोरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी उपमहापौर नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप, शिबीराचे आयोजक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त डॉ. सुधीरकुमार बुक्के, उपआरोग्य संचालक डॉ. राधाकृष्ण पवार, कॅम्प नियोजक डॉ. धर्मेंद्र कुमार, औंध ऊरो रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ली, हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. मनोज दुराईराज, वायसीएम रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत पळशीकर, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ पंकज सुगांवकर, सर्वोत्कृष्ट नेत्रतज्ज्ञ डॉ. विश्वास डाके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विलासराव लांडगे, संदीप जाधव, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, उषा मुंढे, शारदा सोनवणे, शोभा आदियाल, वैशाली जवळकर, सविता खुळे, सुनिता तापकीर, मनीषा पवार, ममता गायकवाड, निर्मला कुटे, आरती चोंधे, कुंदा भिसे, कल्पना जगताप, उर्मिला देवकर, शोभा जांभुळकर, पल्लवी जगताप, कावेरी जगताप, राणी कौर, करिष्मा बारणे, पल्लवी वाल्हेकर, माजी नगरसेवक विलास मडिगेरी, हर्षल ढोरे, सांगर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाळासाहेब ओव्हाळ, संदिप कस्पटे, विनायक गायकवाड, अभिषेक बारणे, राजू दुर्गे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, विभीषण चौधरी, संदीप गाडे, गोपाळ माळेकर, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, माऊली जगताप, शेखर चिंचवडे, संजय भिसे, संदिप नखाते, नितीन इंगवले, तानाजी बारणे, विजय फुगे तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिबीरात सहभागी हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते.

मंत्री सावंत म्हणाले, घर सुरक्षित या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील साडेतीन कोटी महिलांच्या आरोग्याचा पूर्ण डेटा तयार केला आहे. हा एक टप्पा झाला आहे. आता त्या महिलांना सर्व उपचार मोफत देण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नर्सरीतील बालकांपासून ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांपर्यंत सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांच्याही आरोग्याचा डाटा तयार केला जाणार आहे. हे झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करून त्यांचाही डाटा सरकार तयार करेल. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्राचे आरोग्य कार्ड तयार करणारे हे पहिले सरकार आहे. सरकार आपल्या राज्यातील नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करण्यापुरतेच सीमीत न राहता शरीर हे मंदिर आहे आणि आत्मा हे परमेश्वर आहे हे समजून प्रत्येकाला मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देणार आहे.

देशावर व महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःहून काही बंधने पाळावीत. महाराष्ट्रातील 95 टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत. 60 ते 70 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतले आहे. लसीकरणामुळे इतर राज्य आणि देशांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. पण, काळजी म्हणून सोशल डिस्टन्स मेंटेन करणे आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.  प्रत्येकाने स्वतःहून काही बंधने पाळून सण किंवा उत्सव साजरे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, “आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून या महाआरोग्य शिबीराची सुरूवात झाली. या शिबीराच्या आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. गोरगरीब व तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी या शिबीराचे दरवर्षी आयोजन केले जाते. पण कोरोना संकटामुळे त्यात दोन वर्षांचा खंड पडला. 2019 मध्ये या महाआरोग्य शिबीरात तब्बल 2 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. 31 हजार रुग्णांना प्रत्यक्ष उपचार दिले होते. पावणे दोनशे रुग्णांची अँजिओप्लास्टी मोफत करून दिली गेली. गोरगरीब रुग्णांना विविध आजारांतून बरे करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. दिव्यांगांसाठी वर्षातून दोनवेळा शिबीर घेऊन जयफूर फूट व इतर उपकरणांचे मोफत वाटप केले जाते. दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आजच्या शिबीरात 48 हॉस्पिटल आणि 550 डॉक्टर्स व त्यांची टीम उपलब्ध आहे. शिबीरात मानसिक स्वास्थ्यापासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापर्यंतच्या सर्व तपासण्या आणि उपचार मोफत उपलब्ध करून दिले आहेत. या शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या सर्व आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.”