नवी दि्ल्ली, दि. ४ (पीसीबी) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव निश्चित होणार आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. निवडणुकीतील मतदानाच्या चार टप्प्यांनंतर मोदींचा पराभव होणार, हे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, भ्रष्टाचार, रोजगार हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राहुल गांधी यांनी आज ( शनिवारी) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. मसूद अझरची सुटका भाजपच्या काळातच झाली होती, मात्र काँग्रेसने कधीही दहशतवाद्याला सोडले नव्हते, असा दावा त्यांनी केला. निवडणूक जिंकणे हे काँग्रेसचे लक्ष्य असून पंतप्रधान कोण होणार, हे जनताच ठरवेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, चौकीदार चोर आहे, हे खरे आहे. चौकीदाराने हजारो कोटी रुपये त्याच्या उद्योगपती मित्रांच्या खिशात टाकले. पंतप्रधानांकडे तज्ज्ञमंडळी नाहीत, जी आहेत त्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळेच राफेल करारावर मोदी माझ्यासोबत खुली चर्चा करत नाही, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.