‘….म्हणून तिला आत्महत्या करावी लागली’: पिंपरी-चिंचवडमधील खळबळजनक घटना

0
573

पिंपरी, दि. 5 (पीसीबी) :- एक तरुण आणि त्याच्या कुटूंबियांकडून ब्लॅकमेलिंग होत आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे वाकड पोलिसांनी 10 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्याने पोलिसांनी तिचा केवळ तक्रार अर्जच घेतला. जर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई केली असती तर श्रद्धाने आत्महत्या केली नसती, असा गंभीर आरोप मयत तरुणीच्या भावाने केला. ही घटना रहाटणी येथे 26 एप्रिल रोजी घडली.

श्रद्धा कोकणे (रा. रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. श्रद्धा हिचा विवाह नात्यातील अजिंक्‍य साठे या तरुणाशी ठरला होता. त्यांनी एकत्र फोटोही काढले होते. मात्र नंतर मात्र साठे कुटूंबियांकडून भरमसाठ पैशाची मागणी झाली. त्यातच अजिंक्‍य याचे इतर काही मुलींशी संबंध असल्याचेही श्रद्धा हिला कळाले. यामुळे तिने अजिंक्‍यशी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. मात्र साठे कुटूंबिय आणि त्यांच्या नातेवाइकांकडून लग्नासाठी दबाव आणला. लग्न न केल्यास तुझे माझ्यासोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अजिंक्‍य साठे याने दिली. यामुळे श्रद्धा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यात गेली.  मात्र तेथील एका महिला अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे पोलिसांनी केवळ तक्रार अर्जच घेतला.

त्यानंतर राजकीय नेता असलेल्या अजिंक्‍य याच्या दाजीकडून पोलिसांवर दबाव आणला. मी श्रद्धा व तिच्या कुटूंबास कोणताही त्रास देणार नाही. तिचे फोटो व व्हिडिओ डिलिट केले आहेत, अशा आशयाचा अगोदरच टाईप केलेल्या एका कागदावर अजिंक्‍य याची केवळ स्वाक्षरी घेण्याची औपचारिकता पोलिसांनी दाखविली. मात्र त्यानंतरही अजिंक्‍यकडून श्रद्धा हिला सोशल मिडियावर त्रास देणे सुरूच होते.  हा त्रास असहाय्य झाल्यावर श्रद्धा हिने 26 एप्रिल रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूला अजिंक्‍य साठे, त्याचे आई वडिल, दोन बहिणी आणि दाजी जबाबदार असल्याचे तिने आपल्या मोबाइलवर टाइप करून ठेवले होते. तिच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करतानाही सहा ऐवजी पोलिसांनी फक्‍त तीनच आरोपी असल्याचे दाखविले. जर पहिल्यांदाच पोलिसांची गुन्हा दाखल करून आरोपींवर योग्य ती कारवाई केली असती तर कदाचित श्रद्धा हिच्यावर आत्महत्येची वेळच आली नसती, असे तिच्या भावाने सांगितले.

गुन्हा दाखल न करणारी महिला पोलीस अधिकारी आणि आरोपी अजिंक्‍य याचे दाजी यांचे हिंजवडीपासून चांगलीच ओळख आहे. त्यामुळे त्या महिला अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला नाही. तसेच सध्या तपास करीत असलेले पोलीस अधिकारीही आरोपींचे नातेवाईक आहेत. त्यामुळे हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी मागणी मयत श्रद्धा यांचा भाऊ ऋतिक कोकणे यांने केली आहे. तसेच संबधित सहा आरोपी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पैशाची मागणी करणारी महिला अधिकारी यांच्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.