‘मोहन भागवत जर खरे देशभक्त असतील, तर त्यांनी…’ ; ओवैसींच मोहन भागवतांना ओपन चॅलेंज

0
448

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची खरमरीत टीका खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर केली आहे. तर, ‘तुम्हीच खरे देशभक्त’ असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधलाय. भारतानं आत्मनिर्भर व्हावं, असं मोहन भागवतांनी म्हटलं होतं. यावरून त्यांनी भागवतांना सुनावलंय. चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत घुसून बसले आहेत, हे खरे देशभक्त या नात्याने भागवत यांनी मान्य करावे, असं ओवैसी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी आरएसएसची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावं, असं आव्हान त्यांनी भागवतांना दिलं.

“मोहन भागवत म्हणतात की कोणत्याच गोष्टीसाठी आपण चीनवर विसंबून राहायला नको. मग भारतात नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था कोणी उद्ध्वस्त केली?, देशातील आर्थिक स्थितीला कोण जबाबदार आहे?, केवळ आणि केवळ मोदी सरकार जबाबदार आहे. करोना महामारीत मोदी सरकारनं जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय. मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत भागवत यांचं विधान बोगस आहे,” अशी टीका ओवैसींनी केली. चीनी सैनिक भारतात घुसून बसले आहेत ही वास्तविकता आहे आणि ती मोहन भागवतांना दिसत नाही. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. नोटाबंदीचे दुष्परीणाम देश अद्यापही भोगत असल्याचं ओवैसी म्हणाले.

“देशाने आत्मनिर्भर व्हायला हवं. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढेच सुरक्षित असू. आपण किती कमवतो यावर आपलं राहणीमान निर्भर नसावं तर, आपण किती कर भरतोय यावर निर्भर असावं,” असं मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हणाले होते.