नाशिक, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांच्यावरील रागामुळे भाजपचा तीन राज्यांमध्ये पराभव झाला आहे. विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात, असे सांगून लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचे धोरणच भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सध्याचे सरकार बेकार आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.
राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज ( शनिवार) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कॉम्प्यूटर, मोबाइलवरून होणारी माहितीची देवाण-घेवाण, त्यात साठवलेली माहिती तपासण्याचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा आणि तिच्या छाननीचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने काढली आहे. यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. मोदींना लोकांच्या घरात घुसून पाहायचे असेल तर पाहावे. लोक त्यांना शिव्या घालतात हे तरी कळेल. आधी लोकांचे पैसे काढले आता घरात घुसून पाहणार का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
जशी जशी निवडणूक जवळ येईल, तसे सरकारच्या चुकांचे प्रमाण वाढेल, नोटाबंदी हा मोदींनी स्वत:साठी खणलेला खड्डा होता, अशी टीकाही त्यांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार का, या प्रश्नावर उत्तर देताना राज म्हणाले की, भाजप आधी पायावर फावडा मारेल, मग कुदळ मारतील, दोन्ही एकाच वेळी मारणार नाही, असे सांगत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाही, असे त्यांनी म्हटले.