मुंबई पोलीस कधीही सुडाने कारवाई करत नाहीत – शिवसेना खासदार संजय राऊत

0
214

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नाही असं ते म्हणाले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत असं सांगत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचं समर्थन केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत. त्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“रिपब्लिकने आम्हा सर्वांविरोधात बदनामीची मोहीम चालवली होती. खोटे आरोप केले होते. खोटे आरोप होत असतील तर त्याचाही तपास झाला पाहिजे असं आम्ही म्हटलं होतं. आता कोण काय म्हणालं याचं स्पष्टीकरण मी देण्यासाठी आलेलो नाही,” असं यावेळी ते म्हणाले.