मुंबई,दि.१३(पीसीबी) : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रोखठोक मधील आपल्या लेखातून साद घालण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत “मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड.. छत्रपती शिवाजी महाराज!!” अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
मुंबई असो कि महाराष्ट्र.. एकच ब्रँड..
छत्रपती शिवाजी महाराज!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 13, 2020
दरम्यान, राऊत यांच्या या भूमिकेवर मनसे नेत्यांनी रोखठोख प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राऊत यांना सुनावल्याचे दिसून आले आहे. “महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?” अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या रोखठोकमधील सादेला खरमरीत उत्तर दिले आहे.
तर,अमेय खोपकर यांनी “शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचं तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे” अशा शब्दांत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. “सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या.” असही खोपकर बोलताना म्हणाले.