मुंबईत दोन आठवड्यात, तर राज्यात दोन महिन्यांत कोरोना नियंत्रणात

0
196

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी दोन आठवड्याचा अवधी लागेल असा दावा आयआयटी, मुंबईच्या अहवालात करण्यात आला आहे. देशाची परिस्थितीही लवकरच बदलेल आणि महाराष्ट्रात कोरोनावर दोन महिन्यात नियंत्रण मिळवता येईल असेही या अहवालात म्हटले आहे. कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. भास्करन रमण यांनी कोरोनावरील नियंत्रणाबाबत हा अहवाल तयार केला आहे.

या अहवालात लेविट्झ मॅट्रिक्स मॅथेमॅटिकल फॉर्म्युलाचा वापर करून ग्राफिकल सादरीकरण तयार केले गेले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या अहवालात करोनाग्रस्तांची संख्या, मृत्युदर आणि या साथीच्या रोगाने झालेल्या मृत्यूची संख्या या आकडेवारीचा उपयोग करून देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या कालावधीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत आले असल्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे सांगितले. आयआयटीच्या अहवालानुसार बरे होण्याचा आणि मृत्यू कमी होण्याचा हा वेग कायम राहिल्यास मुंबईतील कोरोनाची परिस्थिती दोन आठवड्यांत नियंत्रित होऊ शकेल.

मुंबई व्यतिरिक्त डॉ. भास्करन रमण यांनी गणिताच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोना नियंत्रित होण्याच्या कालावधीचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यानुसार, कोरोनावरील नियंत्रण महाराष्ट्रात दोन महिन्यांत, दिल्लीत एक महिना, गुजरातमध्ये एक महिना आणि देशातील इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांत कोरोनावर नियंत्रण आणले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.

आयआयटीच्या या अहवालानुसार कोरोना नियंत्रणात आला आहे. परंतु,याचा अर्थ असा नाही की कोरोना पूर्णपणे संपला आहे. हा अहवाल कोरोनामुळे होणार्‍या मृत्युदारातील घट आणि बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ याचा दर याच्यावर आधारित हा अहवाल सदर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, आपण कोरोनाबाबत सावधगिरी बाळगल्यास कोरोनाला आपण नक्कीच हरवू शकतो.