मुंबईच्या राजाची मूर्ती २२ नव्हे फक्त तीन फूट उंचीची

0
717

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव अत्यंत साधेपणात साजरा करायचा तर काही मंडळांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, मुंबईतील गणेश मंडळांची ही भुमिका राज्यातील गणेश मंडळांसाठी एक आदर्श असणार आहे. मुंबईचा राजा अशी ओळख गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. दरवर्षी विविध रुपातील आणि भव्य गणेश मूर्ती हे मुंबईच्या राजाची खासियत असते. परंतु यंदा गणेशभक्तांना मंडपात हे चित्र दिसणार नाही. मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये चर्चा झाली होती. कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने हा निर्णय घेतला असून लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी दिली.

1928 साली लालबाग सार्वजनिक गणेशत्सोवाची स्थापना करण्यात आली होती. यंदा या मंडळाचं 93वं वर्ष आहे. मुंबई आणि गणेशोत्सवाचं खास नातं आहे. मुंबईत मोठ्या उत्साह गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

गणेशगल्लीत असा साजरा होणार उत्सव!
गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि मुंबईतलं सर्वात उंच मूर्ती बसवणारं मंडळ म्हणून गणेशगल्लीची ओळख आहे. दरवर्षी पाद्यपूजन सोहळ्याने याची सुरुवात होते. पण यंदा 22 फुटांची मूर्ती रद्द केल्याने पूजेसाठी तीन फुटांची मूर्ती बसवणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी या मूर्तीचं दर्शन फक्त स्थानिकांनाच देण्यात येईल. जे मुंबईच्या राजाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. तसंच यंदा वर्गणी जमा न करता गणेशगल्लीत उत्सव साजरा होणार आहे.

अनेक वर्षांपासून गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाची 22 फुटांची मनमोहक मूर्ती असते. प्रत्येक वर्षी इथे वेगवेगळ्या रुपातील बाप्पा दिसतो. केवळ भव्य मूर्तीच नाही तर मंडपातील देखावा पाहण्यासाठीही भाविक मोठी गर्दी करतात. परंतु यंदा गणेशभक्तांना मोठी मूर्ती पाहायला मिळणार नसली तरी उत्सवाचा उत्साह मात्र कायम असेल.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द
गिरणगावातील 101व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करुन तसंच सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करुन चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल त्यानुसार, मूर्ती बनवण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली आहे. तसेच, मूर्ती जागेवर घडवण्यासाठी चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शवली आहे.

सामाजिक भान जपत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा : मुख्यमंत्री
यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केलं. पुणे आणि इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. याबद्दल शासन जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिली.