निलंगा, दि. २ (पीसीबी) – माझे जन्मगाव नागपूर असले तरी निलंग्याने मला पुनर्जन्म दिला आहे. त्यामुळे माझ या गावाशी वेगळे नाते आहे, असे भावनिक मत व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेला उजाळा दिला.
फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी निलंग्यात पोहचली होती. या निमित्त आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. २५ मे २०१७ रोजी कार्यक्रम संपल्यानंतर परत जात असताना फडणवीस यांचे येथे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता. या अपघातात ते थोडक्यात बजावले होते.
मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी दोन वर्षापूर्वी झालेल्या घटनेला या निमित्ताने उजाळा दिला. निलंग्याचे नात वेगळे असल्याचे सांगून ते म्हणाले की, माझी जन्मभूमी नागपूर असली तरी मला पुनर्जन्म देणारे निलंगा हे गाव आहे. त्यामुळे या गावाशी माझ वेगळ नात आहे. या गावाला मी कधीही विसरणार नाही, असे भावनिक उदगारही त्यांनी काढले. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवण्यासाठी व या गावाला परत येण्यासाठी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.