माझा वाढदिवस साजरा करू नका, दुष्काळी भागातील जनतेला मदतीचा हात द्या; आमदार जगताप यांचे आवाहन

0
1195

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – राज्यातील जनता सुलतानी दुष्काळी संकटाला सामोरे जात आहे. जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी तसेच रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. ‘जीवन जगायचे कसे’ असा प्रश्न दुष्काळी भागातील जनतेसमोर आहे. अनेकजण दोन वेळ पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे स्थलांतर करु लागले आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून दुष्काळी भागातील जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी येत्या १५ फेब्रुवारीला असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिग्ज, फ्लेक्स, हार, बुफेवर केले जाणारा अनावश्यक खर्च टाळून कार्यकर्त्यांनी दुष्काळी जनतेला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

आमदार जगताप म्हणाले, “राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्याच्या १५१ तालुक्यांत दुष्काळ परस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याला अजून सुरूवात झाली नाही तोपर्यंत जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ऐन उन्हाळ्यात तर याहूनही गंभीर परस्थिती निर्माण होणार आहे. शेतमजुराच्या हाताला काम नसल्याने अनेकांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागात शेतकऱ्यांचे वीज बिल, विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क वसुलीही भाजप सरकारने माफ केली आहे.

शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून दुष्काळात होरपळणाऱ्या आपल्या बांधवांना मदत करण्याची आवश्यकता आहे. येत्या १५ फेब्रुवारीला माझा वाढदिवस आहे. माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांवर खर्च करतात. माझ्या सर्व हिंतचिंतकांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळावा. तो खर्च दुष्काळी बांधवांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित निधी संकलन करावे. त्यासाठी भाजपच्या मोरवाडीतील शहर कार्यालयात संपर्क साधावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.”