महाराष्ट्रातील ‘या’ गावात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची 67 वर्षाची परंपरा आजही कायम

0
275

सोलापूर, दि.२ (पीसीबी) : राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक असे गाव आहे की, या गावाला 67 वर्षाची निवडणूक बिनविरोध परंपरा कायम राहिली आहे. माढा तालुक्यातील निमगाव (टे. ) या ग्रामपंचायतीने 67 वर्षापासून एकही निवडणूक पाहिली नाही. यामुळे राज्यांमध्ये निमगाव ही आदर्श ग्रामपंचायत ठरत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव (टे) गाव आहे. दिवंगत विठ्ठलराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 67 वर्षांपूर्वी निमगाव (टे ) ग्रामपंचायत स्थापन झाली. त्यानंतर आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कारभार यशस्वीरित्या झाला आहे. गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार हा ज्येष्ठ मंडळी ठरवतात. गावातील प्रत्येक प्रभागाचा आरक्षणानुसार एकमताने उमेदवार दिला जातो. ना कसली स्पर्धा ना कुठला वाद. निमगाव या गावातून आजपर्यंत एकही पोलीस तक्रार नोंद नाही. गावातील जेष्ठ मंडळींकडून गावातील तंटे मिटले जातात. गावातील विकासाबाबत पाणी, रस्ते, आरोग्य सुविधांबाबत गाव विकासाचे मॉडेल आहे.
गावातील प्रत्येक युवकाला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. गावातील शाळेला एक आदर्श शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त आहे. निमगाव टें गाव आर्थिकदृष्ट्या सधन असलेले गाव, उजनी, सीना माढा योजनेच्या पाण्यामुळे बागायती भाग आहे. अस असल तरी निमगाव व्यसनमुक्त गाव आहे. गावात ग्रामस्थांच्या सोयी साठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. पहिलीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची सोय याठिकाणी केली आहे. गावात प्रत्येक कुटुंबाला आर ओ पाणी दिलं जातं.

गावचा परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे. निमगाव गावामध्ये तीन हजार लोकसंख्या असणारे गाव आहे. एकूण अकरा सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे गावांमध्ये विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. निमगाव या ग्रामपंचायतीला राज्य शासनाचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अनेक गावांमध्ये निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न केले जातात. मात्र त्यांना त्यात यश येताना दिसत नाही. मात्र 67 वर्षापासून निमगाव या गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम आहे. त्यामुळे गावात सुख आणि शांतता नांदते आहे.

बिनविरोध झालेल्या निवडणुकीमध्ये गावातील युवकांनी मोठी जबाबदारी दिली आहे. यापुढील काळात गावाला आदर्श बनवण्याचे काम करणार आहे. गावात प्रामुख्याने आरोग्य आणि सामाजिक विषयांवर भर देणार आहे. गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहे. गावातील बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. यामुळे गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे. यापुढील काळात क्रीडा क्षेत्रात मोठा विकास करण्याचे स्वप्न आहे.