महायुती महत्वाची का झाडांची महातुटी? सचिन सावंतांची टीका

0
346

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेड साठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे.  या वृक्षतोडीचे  सर्वच स्तरातून  तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी  ट्वीट करून  राज्य सरकारवर  हल्ला चढवला आहे.

सावंत यांनी हीच ती वेळ आहे! सरकार मध्ये आहात, हे थांबवू शकता. महायुती महत्वाची का झाडांची महातुटी? કેમ છો #AareyForest तरी म्हणा, निदान! असा निशाणा  शिवसेनेवर साधला आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी  शिवसेना आणि भाजप  यांची युती झाली आहे.  त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोडीवरून हल्लाबोल केला आहे. ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काँलनीतील झाडे तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवा. झाडे तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले,  तर अधिक बरे होईल ? असे ठाकरे यांनी  म्हटले आहे.  तसेच आरेमधील जैवविविधता संपवण्याचा  रचलेला  घाट  लज्जास्पद आहे,  असेही त्यांनी म्हटले आहे.