मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

0
484

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईलने शुटिंग करून गुप्त मतदानाच्या संकल्पनेला हरताळ फासण्यात आला होता. यामुळे मतदार केंद्रावर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. फक्त मोबाईलच नव्हे तर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर नेऊ नये अशी सक्त ताकीद निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना तसे आवाहन केले आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानावेळी झालेले फेसबुक लाईव्ह आणि तिसऱ्या टप्प्यातील टिकटॉकच्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे. यामुळे नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान कडक बंदोबस्तात होणार आहे.