भिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी

1135

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – भिमाकोरेगाव दंगल प्रकरणी बुधवारी (दि.३ जानेवारी) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे मंगळवारी (दि.२७ मार्च) राज्यविधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील पिंपरी-चिंचवड शहरातील दोन आंदोलकांना अटक केली आहे. गुन्हेमागे घेण्याविषयी शासन स्तरावर अंतिम कार्यवाही सुरु असून अटक सत्र त्वरीत थांबवावे अशा मागणीचे निवेदन आज पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना देण्यात आले.

हे निवेदन सुरेश निकाळजे, धम्मराज साळवे, अर्चना गायकवाड, संगिता शहा, अमोल उबाळे, भारत मिरपगारे आणि अजय लोंडे यांनी दिले असून शासनाचा जी-आर येऊ पर्यंत कोणालाही अटक करु नये अशी मागणी करण्यात आली आहे.

भिमा कोरेगाव येथे घडलेल्या जातीय दंगलीच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३ जानेवारी २०१८) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान आंदोलनात सहभागी असलेल्या दोन आंदोलकांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यविधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देवून देखील त्यांना अटक केल्याने समाजात सभ्रमाचे वातावरण आहे. तसेच आंदोलकांवरील गुन्हेमागे घेण्याविषयी शासन स्तरावर अंतिम कार्यवाही सुरु असून अटक सत्र त्वरीत थांबवावे अशी विनंती पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे करण्यात आली. मात्र आयुक्त रजेवर असल्याने पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी निवेदन स्विकारले आहे.