नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मिर मधून कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. त्यानंतर विरोधकांनी राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ केला.
३७० कलम हटविल्यानंतर आता जम्मू काश्मिर आणि लडाख ही दोन वेगळे केंद्रशासित राज्य म्हणून उदयास येणार आहेत. यानुसार आता लडाख आणि जम्मू काश्मीर हे वेगळे राज्य असणार आहे. ३७० च्या तरतुदी हटवल्यामुळे जम्मू काश्मीरला मिळणारे विशेषाधिकार कमी होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लडाखच्या लोकांनी लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील असे त्यांचे मत होते. त्यांची ही मागणी मोदी सरकारने पुर्ण केली आहे.
अमित शहा यांनी ३७० कलम हटवण्याचे विधेयक मांडताच संसदेत विरोधी पक्षांचा थयथयाट पाहायाला मिळत आहे. जम्मू–काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे’ असं ट्वीट मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे.