भारताचा न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय; मालिकेत ३-० विजयी आघाडी

0
696

बे ओवल, दि.२८ (पीसीबी) – सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबत भारताने  ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.  न्यूझीलंडने २४४  धावांचे आव्हान भारताला विजयासाठी दिले होते. विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. रोहितने ६२ तर कोहलीने ६० धावा केल्या.  यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक  यांनी भारताचा विजय साकारला.  

न्यूझीलंडच्या भूमीवर  भारतीय संघाने तब्बल एका दशकानंतर मालिका विजय मिळवला आहे. २००८-०९ साली भारताने न्यूझीलंडमध्ये ३-१ च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती.  न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने  २ तर मिचेल सँटनरने १ बळी घेतला. याआधी रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने ४९ षटकात २४३  धावांची मजल मारली. अनुभवी रॉस टेलरने ९३ तर टॉम लॅथमने ५१ धावांची खेळी केली.  कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर जम बसवू शकले नाहीत.  यानंतर कर्णधार केन विल्यमसनने  संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद  झाला.

यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यानंतर  न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा  डळमळला.  तळातील  फलंदाजांनी फटकेबाजी करत  २४३  धावांपर्यंत टप्पा गाठला.  भारताकडून मोहम्मद शमीने ३ बळी टिपले.  त्याला हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी २-२ आणि भुवनेश्वरने १ बळी घेत साथ दिली.