पंढरपूर, दि. २२ (पीसीबी) – भाजपमधील वाचाळवीरांची तोंडे बंद करण्यासाठी मोदींना बांबूचा कारखाना काढावा लागेल, अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (शनिवार) येथे केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पक्षातील वाचाळवीरांच्या तोंडात बांबू घालावा लागेल, असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आता भाजपच्या वाचाळवीरांच्या घशात बांबू घालण्यासाठी मोदींना देशात एक बांबूचा कारखाना सुरु करावा लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला. भाजप हा आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या तालुका आणि गावपातळीचे नेते पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत युतीची विधाने करीत आहेत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील बड्या मंडळींनी वेळ मागितली आहे. तसेच काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पंढरपूरच्या महासभेत होणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले . हनुमानाबाबत सुरु असलेल्या वाचाळवीरांच्या विधानाचा समाचार आजच्या सामनामधून घेतला आहे. भाजपने आता राममंदिरावर बोलणे बंद करावे, असा उपरोधिक सल्ला त्यांनी भाजपला दिला.