‘बुरा न मानो होली है’ म्हणत संजय राऊतांनी केलं खास ट्विट; पण नक्की कोणासाठी…?

0
304

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : ‘बुरा न मानो होली है’ असं म्हणत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी होळीनिमित्त एक खास ट्विट केलं आहे. या अशा आशयाचं ट्विट नक्की कोणासाठी केले आहे. शायरीतून राऊतांनी नेमका कुणावर निशाणा साधला, याबाबद्दल अजूनही संभ्रम आहे.

सध्या ठाकरे सरकार हे विरोधी पक्षाच्या निशान्यावरती आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे खेळ अतिशय गंभीररित्या खेळले जात आहेत. तर त्यातच सरकारमधील महत्त्वाचे मंत्री अनिल देशमुखही वादात सापडले आहेत त्यामुळे ठाकरे सरकारचा पाय आणखी खोलात गेला आहे. आणि अशा गरम राजकीय वातावरणात आलेल्या होळी निमित्त संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. “आसमान मे उडने की मनाही नही है, बस शर्त इतनी है कि जमीन को नजर अंदाज ना करे” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रातील घडामोडींवर सर्वात जास्त चर्चा दिल्लीत झाली. कारण फडणवीस वारंवार दिल्लीत येऊन पत्रकार परिषदा घेत होते. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादणारच असे चित्र दिल्लीतील मीडियाने निर्माण केले. ते सर्वस्वी चुकीचे ठरले. विरोधी पक्षनेते वारंवार दिल्लीत जाऊन काय करतात, हा प्रश्न आहे. फडणवीस दिल्लीत गेले नसते तर या प्रकरणाची धग कायम राहिली असती”, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला होता. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर टीका केली होती. त्याचबरोबर ठाकरे सरकारलाही त्यांनी लक्ष्य केलेलं आहे.

“अनिल देशमुख, वाझे, परमबीर यांचे पत्र या सर्व घोळात सरकारचा पाय नक्कीच अडकला. तो पुनःपुन्हा अडकू नये. अधिकाऱ्यांनी सरकारला अडचणीत आणले. वाझे हा साधा फौजदार, रश्मी शुक्ला या ज्येष्ठ आयपीएस. परमबीर हे त्यापेक्षा ज्येष्ठ. अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे. आपल्याच मर्जीतले अधिकारी नेमण्याचा पायंडा नव्याने पडला. हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले! सरकारने काय करावे हे सांगण्यासाठी हा प्रपंच नाही. सरकार निसरड्या टोकावरून घसरत आहे व नशिबाने वाचत आहे. या सर्व खेळात महाराष्ट्राला नक्की काय मिळाले?,” असा सवाल करत दुसरीकडे ठाकरे सरकारलाही राऊत यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.